कोपरगाव – नैसर्गिक किंवा कृत्रिम संकटामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या विमा कंपनी मार्फत पंतप्रधान पीकविमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत मका पिकाचाही समावेश करावा, अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीच्या दुष्काळातून अद्याप शेतकरी सावरला नाही. त्यातच यावर्षी पडलेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन, बाजरी, कपाशी, मका आदी पिकांची पेरणी केलेली आहे. विहिरींना पाणी नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही हंगाम वाया जाऊ नये, तसेच पाऊस पडेल, या आशेवर त्यांनी पेरणी केलेली आहे. दुष्काळामुळे पिकाचे नुकसान झाले, तर सोयाबीन, बाजरी, कपाशी या पिकांचा पीकविमा काढल्यास काही तरी नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. परंतु यावर्षी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मका पिकाचे उत्पन्न मोठप्रमाणावर घटणार आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अशी परिस्थिती असताना इतर पिकांचा विमा स्वीकारण्यात येतो. मात्र मका पिकाचा विमा स्वीकारण्यात येत नाही.
मागील वर्षी कोपरगाव तालुक्याच्या शेजारील तालुक्यांचा दुष्काळी यादीत सामावेश झाला. मात्र कोपरगावला वगळण्यात आले. एकीकडे मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला, तर दुसरीकडे मका पिकाला विमा कवच मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भविष्यात होणाऱ्या नुकसानीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पीकविमा योजनेत मका पिकाचा समावेश करावा, अशी मागणी काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.