माऊलींचा सोहळा दोन जुलैला जिल्ह्यात
फलटण – आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर पालखीचे आळंदी येथून यावर्षी 25 जूनला प्रस्थान असून सोहळ्याचे सातारा जिल्हात 4 मुक्काम आहेत. 2 जुलै रोजी पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. लोणंद येथे एकच मुक्काम असून सोहळ्यातील पहिले उभे रिंगण 3 जुलै रोजी तरडगाव नजिक चांदोबाची लिंब येथे होणार आहे.
संत ज्ञानेश्वर पालखी पंढरपूरकडे जाण्यासाठी 25 जून रोजी प्रस्थान ठेवणार असून पहिल्या दिवशी सोहळा आळंदीतच नवीन दर्शन मंडपात मुक्कामी राहणार असल्याचे विश्वस्तांनी कळवले आहे. जिल्ह्यात 2 जुलैला लोणंद, 3 जुलै रोजी तरडगाव, 4 जुलै रोजी फलटण, 5 जुलै रोजी बरड येथे पालखी सोहळा मुक्कामी विसावणार आहे. 6 जुलै रोजी सोहळा सोलापूर जिल्हात प्रवेश करणार आहे.
पालखी सोहळा संदर्भाने आळंदी देवस्थान प्रमुख विश्वस्त डॉ. विकास ढगे, सोहळा प्रमुख योगेश देसाई, पालखीचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, राणा महाराज वासकर, विठ्ठल महाराज वासकर, राशीनकर महाराज, एकनाथ हांडे, टेंभूकर महाराज, भाऊ फुरसुंगीकर, मारुती कोकाटे, माऊली महाराज जळगावकर यांच्या उपस्थितीत दोन दिवसापूर्वी (ता. 15) पंढरपूर येथे बैठक झाली होती.