सेंच्युरी एन्का कंपनीच्या 2 मशीन जळून खाक : सुदैवाने जीवितहानी नाही
पिंपरी – शहरासाठी मंगळवारचा दिवस आगीचा ठरला. एकाच दिवशी एमआयडीसीतील एका बड्या कंपनीला तर पिंपरीतील एका दुकानास आग लागली. या दोन्ही आगींमध्ये लाखों रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी दोन्ही ठिकाणची आग आटोक्यात आली. सुदैवाने या दोन्ही आगींमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भोसरी एमआयडीसी येथील सेंच्युरी एन्का कंपनीमध्ये आज मंगळवार दि. 21 मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीमध्ये मशीन जळून खाक झाल्या. आग लागली तेव्हा कंपनीमध्ये 77 कर्मचारी काम करीत होते. सुदैवाने कोणतीही जिवतहानी झालेली नसली तरी टायरमधील नायलॉनचे धागे बनवणारी मशीन, कंट्रोल पॅनल बोर्ड इंसुलेशन आणि दोन आर्यन प्लांट जळून खाक झाले आहेत. यामध्ये मोठे नुकसान झाल्याची माहिती कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने एक गाडी पाठवली होती. मात्र, आग भीषण असल्याने तातडीने वल्लभनगर येथील अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या, भोसरी, प्राधिकरण, तळवडे, चिखली, बजाज कंपनी, टाटा मोटार्स, एमआयडीसी चाकण आणि हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्याही आग विझवण्यासाठी मागवण्यात आल्या आहेत. एकूण 13 अग्निशमन गाडीच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
कंपनीमध्ये ही आग इंडस्ट्रीयल आर. एन प्लान्टच्या तळमजल्यावर लागली होती.
आग ज्यावेळी लागली तेव्हा कंपनीमध्ये 77 कर्मचारी काम करीत होते. अग्निशमन विभागाने तत्काळ सायरन वाजवून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी पाठवले. आर.एन प्लान्टमधील दोन्ही मशीनने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने कंपनीमध्ये धुराचे लोळ उठले होते. त्यामुळे आगीवर नियत्रंण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवांनाना मोठ्या अडचणीला समोरे जावे लागत होते. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनतर दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान जवांनाना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
यावेळी अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी अशोक कानडे, ऋषिकांत चिपाडे, नामदेव शिंगाडे, सूर्यकांत मठपती, शांताराम काटे, फायरमन अशोक कदम, प्रतीक कांबळे, महेंद्र कोटक, मुकेश बरवे, शंकर पाटील, सुरज गवळी, रुपेश वानखेडे, विकास नाईक, दिपक साळवी, दिपक ढवळे, सोमनाथ तुकदेव, अवधूत अल्लाट, सुशील कुमार, वाहनचालक संदीप जगताप, अमोल खंदारे, पद्माकर बोरावके, मारुती गुजर, जयदीप पवार व 8 फिटर या 35 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.