कोपरगाव: सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यातील गळीत हंगाम 2018-19 च्या गळीतास आलेल्या उसाला शेततळे व ठिबक अनुदानापोटी प्रति मेट्रिक टन 100 रूपयांप्रमाणे 2 कोटी 7 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी दिली.
माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांना शेतकऱ्यांविषयी असलेल्या तळमळीची जाणीव ठेऊन माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची धुरा उत्तमपणे सांभाळत आहे. 2018-19 च्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी गाळपास येणाऱ्या उसाला प्रती मेट्रीक टन 2300 रुपयांची पहिली उचल देणार असे जाहीर करून यावरच थांबणार नाही, असा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवत 2018/19 च्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला सरसकट एकरकमी वीनाकपात 2500 रुपयाचा दर दिला आहे. 2018-19 च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाची देय रक्कम कारखान्याने नियमाप्रमाणे त्या त्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली असून, चालू गळीत हंगामात प्रती मेट्रीक टन 100 रूपयेप्रमाणे 2 कोटी सात लाख रुपयांचे शेततळे व ठिबक अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
यंदा दुष्काळाची परिस्थिती भयावह असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देत शेततळे व ठिबक अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. आज दुष्काळाच्या दृष्टचक्रात सहकारी साखर कारखानदारी अडकलेली आहे. साखर उद्योगापुढे अनेक आव्हाने असतांनाही नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित पाहणारे माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांचा वारसा आशुतोष काळे समर्थपणे पुढे चालवीत आहेत.
संरक्षित सिंचन व्यवस्था काळाची गरज
दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. आतबट्ट्याचा झालेला शेती व्यवसाय अधिक फायदेशीर कसा करता येईल, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे काळाची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांमध्ये सूक्ष्म सिंचनाचा व पाणी बचतीची जागरूकता निर्माण होऊन, कमी पाण्यात जास्तीत उत्पन्न घेण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी यापुढेही नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले.