जामनगर: माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातच्या जामनगर न्यायालयाने 1990 मध्ये कैदेत असलेल्या एका आरोपीच्या मृत्यू प्रकरणी त्यांना दोषी ठरविले आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात भट उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी न्यायमुर्ती डी. एम. व्यास यांनी प्रणवसिंह आणि संजीव भट यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय होते प्रकरण ?
1990 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेवेळी गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात हिंसाचाराची घटना घडली होती. त्यावेळी संजीव भट जामनगरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक होते. या हिंसाचारानंतर पोलिसांनी जवळपास 150 नागरिकांना अटक केली होती. या अटक केलेल्यांपैकी आरोपी प्रभुदास माधवजी वैश्नानी यांचा कोठडीत मृत्यू झाला होता.
या आरोपीला कैदेत असताना मारहाण केल्याचा आरोप संजीव भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आला होता. त्यानंतर भट यांच्यासह 8 पोलिसांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र तत्कालीन गुजरात सरकारने त्यावेळी पोलिसांविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली नव्हती. परंतु 2011 मध्ये राज्य सरकारने भट यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी दिल्यानंतर हे प्रकरण पुन्हा समोर आले.