उत्तर आणि पश्चिम भारतात यशाची पुनरावृत्ती
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश संपादन करताना भाजपने देशातील अनेक राज्यांत 50 टक्क्यांहून अधिक मते खेचली. उत्तर आणि पश्चिम भारतात त्या पक्षाने मागील निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती केली.
भाजपने यावेळी स्वत:ची कामगिरी आणखी उंचावल्याचे स्पष्ट होत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तिसगढ, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांत पक्षाच्या पदरात निम्म्याहून अधिक मतांचे दान पडले. उत्तरप्रदेशात भाजपने संख्याबळ काही प्रमाणात घटले. मात्र, त्या राज्यातील निम्मे मतदार भाजपवर विश्वास दाखवतील, हा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या विश्वास खरा ठरला.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूला बरोबर घेण्यासाठी भाजपने मागील वेळी जिंकलेल्या काही जागांचा त्याग केला. तो निर्णयही उपयुक्त ठरला. संख्याबळाच्या दृष्टीने उत्तरप्रदेशपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असणाऱ्या महाराष्ट्रात शिवसेनेला बरोबर घेऊन भाजपने मागील वेळचे यश टिकवून ठेवले. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि झारखंड या राज्यांतही भाजपने जोरदार कामगिरी केली.