सातारा – टाळ-मृदंगाच्या गजर व हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच अश्वामागून अश्व दौडले आणि माऊली…माऊली नामाचा जयघोष सुरू झाला, अशा अल्हाददायक व उत्साही वातावरणात श्री संत ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे पार पडले. लोणंद मुक्कामी कोकण, कर्नाटकासह सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. चांदोबाचा लिंब परिसरात सुरू असलेला नामघोष आणि महिला- पुरुषांनीही बेभान होऊन घातलेल्या फुगड्या अणि फेर धरून येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच सुरू केला. यावेळी जागेत सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या.