बंगळुरू – भारतीय जनता पक्षानेच आता कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचे ठरवले आहे. आज विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी अविश्वास प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेवर घेण्याचा प्रस्ताव दिला. एकूण सोळा आमदारांनी या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे हे सरकार अल्पमतात आले आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे अशी माहिती येडियुरप्पा यांनी पत्रकारांना दिली.
गेल्या शुक्रवारपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. तथापी राजीनामा दिलेले आमदार विधीमंडळात परतलेले नाहीत. ते अद्यापही महाराष्ट्रातच आहेत असे सांगण्यात येते. दरम्यान या आमदारांच्या राजीनाम्या विषयीच्या प्रस्तावावर सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे. सोळ आमदारांच्या राजीनाम्यामुळे आघाडीचे संख्याबळ शंभरावर खाली आले असून सरकारला पाठिंबा देणाऱ्या अन्य दोन आमदारांनी भाजपला पिांठंबा दिल्याने भाजपचे पारडे जड झाले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कॉंग्रेस व जेडीएस नेत्यांचे कसोशिचे प्रयत्न जारी असले तरी त्यांना त्यात आता यश मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.