बंगळुरू – राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेस-जेडीएस चे किमान डझनभर आमदार फोडून राज्यातील सरकार अस्थिर केल्यानंतर आता भाजपने तेथे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी तसे संकेत दिले आहेत. आम्ही काहीं संन्यासी नाही अशा शब्दात त्यांनी आम्ही सरकार स्थापनेचे प्रयत्न करणार आहोत असे सूचित केले आहे. या आमदारांविषयी सभापतींनी निर्णय दिल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान आमदार फुटण्याच्या घडामोडींशी आपला काहीं संबंध नसल्याचे भाजपने म्हटले असले तरी आघाडीतून फुटुन बाहेर आलेल्या आमदारांना भाजपच्या एका खासदाराशी संबंधीत कंपनीच्याच विमानातून मुंबईला नेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या आमदारांना तेथे एका पंचतारांकित हॉटेलात ठेवण्यात आले आहे. गेले तेरा महिने कुमारस्वामी यांचे सरकार तेथे सत्तेत आहे.
विधानसभेची मुदत संपायला तब्बल चार वर्षांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूका घेण्यापेक्षा सरकार स्थापन करण्याचाच प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे संकेत आहेत.