उत्तरप्रदेशातील 35 पदाधिकाऱ्यांनी सोडली पदे
लखनौ – कॉंग्रेसमधील राजीनामासत्र शनिवारीही कायम राहिले. पक्षाच्या उत्तरप्रदेश शाखेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी त्यांची पदे सोडली. राजीनामा देणाऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला नामुष्कीजनक पीछेहाट स्वीकारावी लागली. त्याची जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी तो निर्णय बदलावा, अशी एकमुखी मागणी पक्षातून होत आहे.
मात्र, राहुल निर्णयावर ठाम आहेत. पक्षाच्या राज्यातील नेत्यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षाही त्यांनी अलिकडेच व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे पक्षात राजीनामासत्र सुरू झाले आहे. राहुल यांना पक्ष संघटनेची फेररचना करण्याची मोकळीक मिळावी हाही त्यामागील उद्देश आहे. त्यापार्श्वभूमीवर, उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष रणजितसिंह जुदेव, उपाध्यक्ष आर.पी.त्रिपाठी, सरचिटणीस आराधना मिश्रा मोना यांनी पदांचा राजीनामा दिला.
अभिनेते राज बब्बर यांनी याआधीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला. उत्तरप्रदेशात यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. खुद्द राहुल यांना पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठीत पराभूत व्हावे लागले.