हैदराबाद – अर्थमंत्रालयाशी संबंधीत स्थायी समितीला जर आपला अहवाल सादर करण्यास आणखी वेळ मिळाला असता तर विदेशांतील बॅंकांमध्ये भारतीयांचा नेमका काळा पैसा किती आहे याचा आम्ही अचूक अंदाज वर्तवला असता अशी माहिती या समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली यांनी दिली आहे. हा अंदाज काढणे अवघड नाही असेही त्यांनी म्हटल आहे. या समितीचा अहवाल काल लोकसभेत सादर करण्यात आला आहे.
या अहवालात विदेशात भारतीयांचा नेमका काळा पैसा किती आहे याचा नेमका अंदाज लागत नाही किंवा त्याविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही असे नमूद करण्यात आले आहे. त्या विषयी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना मोईली म्हणाले की अजून आमचा हा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा आहे. आम्हाला वेळ कमी होता म्हणून आम्हाला काही जणांना साक्षीसाठी किंवा माहिती देण्यासाठी बोलावता आले नाही अन्यथा आम्ही हा नेमका अंदाज देऊ शकलो असतो असे ते म्हणाले. ही माहिती काढणे फारसे अवघडही नाहीं त्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा होता असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने या संबंधात जी एसआयटी नेमली होती. त्यांनीही आपले सात अहवाल दिले आहेत. त्यावर सरकारने काही कृती करणे अपेक्षित होती त्यातून काही प्रमाणात तरी काळापैसा भारतात आणणे शक्य होते. पण सरकारने त्यावर काहीच केले नाही अशी टिपण्णीही त्यांनी केली. सरकार या एसआयटीचे अहवाल दाबून ठेऊ शकत नाही त्याविषयी त्यांना काही तरी कृती करणे भागच आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.