मालमत्ताकराची बिले 15 दिवसांत पोहचवा
नगर – महापालिकेच्या वसुली विभागात 14 कर्मचारी कार्यरत असून वसुलीचे प्रमाण केवळ 18 ते 20 टक्के आहे. हे प्रमाण अंत्यत कमी असून प्रत्येक कर्मचाऱ्याने 50 टक्क्यापर्यंत मालमत्ताकराची वसुली केली पाहिजे. 50 टक्क्यापर्यंत वसुली न झाल्यास कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर उपायुक्तांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज दिले.
महापालिकेच्या मध्यवर्ती शहर व सावेडी वसुली विभागाची बैठक वाकळे यांनी घेतली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, उपायुक्त सुनिल पवार, माजी नगरसेवक नितीन शेलार, सुरज शेळके, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, अंबादास सोनवणे, कर निरिक्षक संजय उमाप, शाम गोडळकर उपस्थित होते.
वाकळे म्हणाले, शहर वसुली विभागात 14 कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु वसुलीचे प्रमाण 18 ते 20 टक्के आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने 50 टक्क्यांपर्यत वसुली करावी. येत्या 15 दिवसात नागरिकांना बिले देवून वसुली केली गेली पाहिजे. ज्या मालमत्ता वादग्रस्त आहेत. त्या मालमत्ताधारकांना नोटीसा देवून किंवा मालमत्तेवर नोटीसा चिकटवून शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात. ज्या कर्मचाऱ्यांची वसुली 50 टक्के होणार नाही त्यांना लेखी नोटीस देवून त्यांच्यावर उपायुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी.
सावेडी वसुली विभागात अजून काही मालमत्तेचे नोंदी झालेल्या नाहीत. त्या नोंदी करण्याबाबत प्रभाग अधिकारी व कर निरिक्षकांनी दखल घ्यावी. प्रभाग अधिकाऱ्यांनी वसुली वाढविण्याच्या दृष्टिने वसुली लिपीकांचा दररोज आढावा घेण्यात यावा. दररोजच्या दररोज वसुलीची माहिती कार्यालयात देण्यात यावी. वसुली विभागामध्ये प्रत्येक झोनसाठी कर्मचारी वाढविण्यात यावेत.जास्तीत जास्त 90 टक्क्यांपर्यंत वसुली झाली तर प्रत्येक कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात येईल तसेच त्या कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे व वेतनवाढ देण्यात येईल. असे वाकळे यांनी जाहीर केले.