मोदींनी देशाची वाट लावली
नवी दिल्ली: आज देशातील निवडणुकांमध्ये मोदींचा पराभव करण्यासाठी जे राजकीय पक्ष झटत आहेत त्यांनाच कमकुवत करण्याचे काम कॉंग्रेस करीत आहे त्यामुळे विरोधी लाट असतानाही जर मोदीच पुन्हा सत्तेवर आले तर त्याला राहुल गांधी हेच जबाबदार असतील असे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. आज पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की त्यांनी उत्तरप्रदेशात सपा-बसपा आघाडीला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. केरळात ते डाव्यांच्या विरोधात लढत आहेत. पश्चिम बंगाल मध्ये ते तृणमुल कॉंग्रेसच्या विरोधात लढत असून दिल्लीत ते आम आदमी पक्षाच्या विरोधात लढत आहेत. आणि त्यामुळे भाजपविरोधाची धार कमकुवत होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले की राहुल गांधी यांची या निवडणुकीतील भूमिका पाहिली तर ते भाजपशी नव्हे तर विरोधकांशीच लढत आहे काय अशी शंका निर्माण होते. पंतप्रधान मोदींच्या कारभारावरही त्यांनी यावेळी सडकून टीका केली. ते म्हणाले की त्यांचे सरकार पुर्ण अपयशी सरकार आहे. देशातल्या कोणत्याही महत्वाच्या क्षेत्रात त्यांना चांगले काम करता आले नाही. मोदींचा राष्ट्रवादही बनावट आणि धोकादायक आहे असे ते म्हणाले. त्यांनी लष्कराचा वापर मतांसाठी केला असा राष्ट्रवाद देशहिताचा ठरू शकत नाही.
भाजपला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले. आम्ही केवळ मोदी शहा या जोडगोळीला सत्तेवरून हटवण्यासाठीच काम करीत असून त्यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आम्हीं दिल्लीत कोणालाही पाठिंबा देऊ असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दिल्लीत आपल्या पक्षाला आता चांगले वातावरण निर्माण झाले असून आम्ही येथील सातही जागा जिंकल्यास मला आश्चर्य वाटणार नाही असे ते म्हणाले..