कर्नाटक – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी सातत्याने खालावली असून, अगदी राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या फळीतील नेते मंडळींनीही वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका लावला आहे. अशातच सोळाव्या लोकसभेत कॉंग्रेस नेतेपदाची धुरा वाहणारे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील चिंचोली येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना खर्गे म्हणाले की,’ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत सांगत आहेत. मोदींचं हे म्हणणं तुम्हाला तरी पटतंय का? असा सवाल करतानाच काँग्रेसला जर ४० हून अधिक जागा मिळाल्या तर मोदी दिल्लीतील विजय चौकात स्वत:ला गळफास लावून घेतील काय? असं धक्कादायक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं आहे. खरगे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवीन वादंगाला सुरुवात झाली आहे.