सांगवी येथील प्रचार सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजपवर टीका
बारामती – बारामतीचा विकास लोकांच्या डोळ्यांत खुपायला लागला आहे, असा मतदार संघ भाजपच्या कुठल्याच राजकीय नेत्यांना करता आलेला नाही. बारामतीत एकही छावणी देता आली नाही. कारण, हे सुटाबुटातले सरकार शेतकरी विरोधी आहे. यामुळे जो-तो उठतो आणि बारामतीकडे लक्ष देतो, भाजप सरकारने पाच वर्षांत कुणालाच काही दिले नाही. भाजप-शिवसेना देशाचे संविधान बदलायला निघाले आहेत, नेते बेताल वक्तव्य करू लागले आहेत. कायदा सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे, भाजप सरकारच्या हुकूमशाही आणि एकाधिकारशाहीमुळे त्यांच्या विरोधात देशातील 22 राजकीय नेते एकत्र आले आहेत. मोदी सत्तेत आल्यास ते देशाला पडवणारे नाही. भाजपने केलेल्या नोटा बंदीचा फायदा कुणालाच झाला नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
सांगवी (ता. बारामती) येथे बारामती मतदार संघाच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, नोटा बंदीमुळे सर्व भ्रष्टाचार झाला, जीएसटी मुळे व्यापाऱ्यांचे दुकानदारांचे कंबरडे मोडले, बॅंका बंद पडल्या, महागाई, बेरोजगारी वाढली, देश देशोधडीला लागला, सरकार बदलून चौकशी सुरू झाल्यास भाजपचे किती नेते जेलची हवा खातात, ते बघा.
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष विश्वास देवकाते, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्या अबोली भोसले, बाळासाहेब तावरे, प्रकाश तावरे, किरण तावरे, मदन देवकाते, योगेश जगताप, महेंद्र तावरे, अंकुश तावरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.