नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘देशात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल’ असा विश्वास दर्शवला आहे. एवढेच नव्हेतर २०१४ च्या तुलनेत या वेळेस भाजपच्या जागांची संख्या वाढेल, असेदेखील मोदींनी सांगितले आहे.
२३ मे नंतर नरेंद्र मोदींचे पॅकअप होणार, असे विरोधक म्हणतात. आणि जर खरंच अशी वेळ तुमच्या आली तर तुम्ही काय कराल? असा सवाल मोदींना करण्यात आला होता. खरच जर अशीच वेळ आली तर, मी माझी झोळी उचलून कधीही निघायला तयार असेन. मला जवळून ओळखणाऱ्यांना ही गोष्ट चांगली ठाऊक आहे. मात्र, मी तुम्हाला खात्री देतो की, जनतेने भाजपच्या हातात पुन्हा सत्ता द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे विरोधक काय विचार करतात, याकडे मी फारसे लक्ष देत नसून, मला देशाच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. विरोधकांना हवी ती स्वप्नं पाहायला मोकळीक आहे, असे मोदींनी म्हंटले आहे.