ओव्हल – भारतीय कर्णधार विराट कोहलीने आज ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय फलंदाजांनी देखील ५ गड्यांच्या मोबदल्यात ३५२ धावांचा डोंगर उभारल्याने भारताला हा सामना सोपा जाणार असं वाटत होतं. मात्र किवी फलंदाजांनी केलेल्या चिकट फलंदाजीमुळे भारतीय संघाला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली.
विजयासाठी ३५३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात देखील भारताप्रमाणेच दिमाखदार राहिली. ऑसी संघाकडून वॉर्नर आणि फिंच यांच्या जोडीने ६१ धावांची सलामी दिली. फिंच धावबाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अनुभवी स्टीव्ह स्मिथने वॉर्नर, ख्वाजा आणि मॅक्सवेल यांच्यासोबत भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. मात्र भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एकाच षटकात स्टीव्ह स्मिथ आणि स्टोनीस यांचा बळी घेत ऑस्ट्रलियाच्या विजयाचा मार्ग खडतर केला. ऑस्ट्रेलियातर्फे अलेक्स कॅरी याने अखेरपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली मात्र शेवट ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.