नवी दिल्ली – भारतात दरवर्षी हवाप्रदुषणामुळे पाच वर्षाच्या आतील किमान एक बालकांचा मृत्यू होतो असे एका पहाणीत आढळून आले आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. भारतातील पर्यावरणावर आधारीत या अहवालात नमूद करण्यात आले आहे की भारतातील दर दहा हजार बालकांपैकी 8.5 टक्के बालके पाच वर्ष पुर्ण होण्याच्या आतच दगावतात. मुलींमध्ये दगावण्याचे प्रमाण 9.5 टक्के इतके आहे. भारतातील एकूण मृत्यूमध्ये हवाप्रदुषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 12.5 टक्के इतके आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सीएसई या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. हवा प्रदुषण नियंत्रणावर सरकारी पातळीवरून केले जाणारे उपाय पुरेसे नाहीत. ही बाब पर्यावरण मंत्रालयानेही मान्य केली आहे. या मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की सरकारने केलेली उपाययोजना प्रभावी ठरत नाही ही वस्तुस्थिती असून ही स्थिती निश्चीतच समाधानकारक नाही. हवा प्रदुषणाच्या बाबतीत जो जागतिक अहवाल अलिकडेच प्रकाशित करण्यात आला आहे त्यात म्हटले आहे की सन 2017 मध्ये भारतातील सुमारे 12 लाख लोक हवाप्रमुषणामुळे दगावले आहेत. ग्रीन पीस या नावाच्या एका संस्थेच्या अहवालातील निष्कर्षानुसार नवी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदुषित राजधानीचे शहर आहे.
मात्र तत्कालिन पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी हा निष्कर्ष फेटाळून लावला होता. केवळ लोकांना घाबरवण्यासाठी अशा प्रकारचे अहवाल प्रकाशित केले जात असतात असे त्यांनी म्हटले आहे. भारत सरकारने सन 2013 साली देशातील सर्व पेट्रोल व डिजेलवर चालणारी वाहने मोडीत काढून सन 2020 पर्यंत सर्वच वाहने इलेक्ट्रीकवरील वाहने करण्याचा निर्धार केला होता. पण आत्ता पर्यंत देशात केवळ 0.28 टक्के वाहने वीजेवर चालणारी वाहने आहेत. भारत सरकारने इंधनावर चालणारी सर्व वाहने व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्या अनुषंगाने कोणतीही प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाही.