मँचेस्टर – मॅंचेस्टर – फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. पाकिस्तानवर भारताने विश्वचषक स्पर्धेत मिळवलेला हा सलग सातवा विजय होता. त्या अर्थाने भारताने फादर्स डेच्या दिवशी पाकिस्तानवरील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजानी अक्षरश नांगी टाकली. भारतीय गोलंदाजीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिरकीपटू कुलदीप यादव आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 5 बाद 336 धावांची मजल मारत पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचे लक्ष्य ठेवले. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजी वेळी सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने पाकिस्तानला 40 षटकांत 302 धावांचे सुधारीत लक्ष्य देण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानला 40 षटकांत 6 बाद 212 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली.
सामन्यात विजय शंकरने पाकला आपल्या पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का दिला. त्याने इमाम-उल-हकला 7 धावांवर असताना पायचीत बाद केले.
त्यानंतर पाकच्या 117 धावा झाल्या असताना कुलदीप यादवने बाबर आझमला 48 धावांवर बाद करत पाकिस्तानला दुसरा झटका दिला.बाबर बाद झाल्यानंतर सावध फलंदाजी करणारा फकर झमान देखील 62 धावा करुन बाद झाल्याने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. पाकची तिसरी विकेट कुलदीपने घेतली.
त्यातच हार्दिक पांड्याने लागोपाठ दोन चेंडूंवर अजून दोन धक्के देत पाकिस्तानचा डाव आणखीनच संकटात आणला.
हार्दिकने हाफिजला 9 धावांवर आणि शोएब मलिकला शुन्यावर बाद केले. यामुळे पाकिस्तानची अवस्था 22 षटकांत 1 बाद 116 धावांवरुन 27 षटकांत 5 बाद 129 अशी झाली.
यानंतर गोलंदाजीस आलेल्या विजय शंकरने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला 12 धावांवर बाद करत पाकिस्तानला सहावा धक्का दिला.
सर्फराज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाल्याने खेळ काही काळ थांबवण्यात आला तेंव्हा पाकिस्तानने 35 षटकांत 6 बाद 166 धावा केल्या होत्या. यानंतर खेळ सुरू झाल्यानंतर पाकिस्तानसमोर विजयासाठी 40 षटकांत 302 धावांचे सुधारीत लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र, पाकिस्तानला 40 षटकांत 6 बाद 212 धावांचीच मजल मारता आल्याने भारताने अखेर विजय संपादित केला.