कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी शासनांच्या पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना 2018 मृग बहारमध्ये फळबागेचा विमा उतरविला होता, मात्र त्यातील काही शेतकऱ्यांना त्याची रक्कम मिळाली नव्हती. आता ती मंजूर झाली असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच ही रक्कम वर्ग होईल, अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, यंदा असलेली दुष्काळी स्थिती त्यात शेतकऱ्यांनी फळबाग विमा उतरविला होता. राज्यातील युती शासनाने या फळबागांना पीक विमा मंजूर केला, मात्र त्यातील वंचित शेतकऱ्यांबाबत शासन, राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषीमंत्री, पालकमंत्री व कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्र्याकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात बैठकही घेण्यात आली. त्यानुसार उपसचिव डॉ. किरण पाटील यांनी शासन निर्णय घेऊन ज्या शेतकऱ्यांची फळपीक विमा योजना मृग बहार रक्कम यापूर्वी मंजूर झाली नव्हती, ती मंजूर केली असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच वर्ग केली जाईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.