टाकळी खातगाव: दुष्काळी अनुदानाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात. अधिकाऱ्यांकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नगर जिल्ह्याला दुष्काळाची दाहकता सहनशीलतेच्या पलिकडे गेली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतातील उभी पिके जळून गेली. जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न तयार झाला पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकण्याची वेळ टाकळी खातगावकरांवर आली.
दुष्काळी भागासाठी केंद्र व राज्य सरकारने अनुदान जाहीर केले. पंतप्रधान योजनेतून वार्षिक 6 हजार रुपये तर, महाराष्ट्र सरकारकडून भूसार पिकासाठी 6 हजार 800 रुपये तसेच दीर्घ पिकासाठी हेक्टरी 18 हजार रुपये अनुदान तातडीने जाहीर करण्यात आले. त्यातील काही रक्कम शासनाने प्रत्येक तहसील कार्यालयाकडे वर्गही करण्यात आली आहे. शासकीय पातळीवर तातडीने माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे माहिती जमा करून शासनस्तरावर पाठविण्यात आल्या आहेत, मात्र त्यातील काहिंना केंद्र सरकारचा 2 हजार रुपयांचा चार हप्ता मिळाला, मात्र त्यातील बहुतांश खातेदार अद्याप वंचित आहेत. याबाबत ग्रामस्तरावर तलाठी यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून मात्र आमचे काम आम्ही केले, याद्या वर पाठवल्यात वरून का अनुदान आले नाही, ते आम्हाला माहित नाही, असे उत्तर देऊन खातेदारांची बोळवण केली जाते.
माहिती पाठवताना खातेदारांकडून ठराविक नमुन्यात फार्म भरुन घेताना बॅंकेचा खाते क्रमांक, आधारकार्ड नंबर, खातेदाराच्या खात्याचा तपशील अशी माहिती मागवली होती, ही सर्व माहिती दिली असतानाही अनुदान का? वर्ग झाले नाही. दिलेल्या याद्या कुठे गहाळ झाले का ? की निवडणूका पुरताच अनुदानाचा फार्स करण्यात आलाय अंशी शंका शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहेत, तरी शासनपातळीवर त्याची दखल घेऊन शेतकऱ्यांचे अनुदान त्वरित वर्ग करण्यासाठी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेल्या फळबागा जगविण्यासाठी अनुदानाची नितांत गरज आहे. पावसाळी वातावरण फक्त महिन्यावर येऊन ठेपले, असताना शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी ना पैशाची नितांत गरज आहे. यावर्षी मशागती विना शेती पडीक राहील व उत्पन्नात घट होईल.