पुणे, –सर्वसामान्यांचे फळ अशी ओळख असलेल्या केळीच्या उत्पादनाला दुष्काळाचा फटका बसला आहे. उत्पादन घटल्यामुळे मार्केट यार्डात नेहमीच्या तुलनेत केवळ 20 टक्केच केळीची आवक होत आहे. त्यामुळे भाव कडाडले आहेत. किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये डझन भावाने केळीची विक्री होत असून आजपर्यंतच्या इतिहासात केळीला मिळालेला हा उच्चांकी भाव आहे.
येथील मार्केट यार्डात मुख्यत: जळगाव भागातून केळीची आवक होत असल्याचे सांगून यशवंत केळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल वायकर म्हणाले, “जळगावसह इंदापूर आणि अकलूज भागातून केळीची आवक होत असते. आषाढी एकादशीपर्यंत केळीचे भाव माफक होते. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार 16 ते 17 रुपये भाव मिळत होता. त्यानंतर केळीच्या मागणीत आणि पर्यायाने भावात सातत्याने वाढ होत आहे.’ गेल्या वर्षी मार्केट यार्डात दररोज 15 ते 20 गाड्यांची आवक होत होती. ती आता फक्त 4 ते 5 गाडीच होत आहे.