संस्थापक अहमद निजामशहा यांच्या स्मृतीस्थळी चादर अर्पण
हाजी अजीजभाई व कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शहर स्थापना दिन साजरा
नगर: सव्वापाचशे वर्षापेक्षा अधिक काळखंडाचा वैभवशाली इतिहास असलेल्या अहमदनगर शहराला गतवैभव प्राप्त करुन देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लाभलेला ऐतिहासिक वारसा हे या शहराचे वैभव असून, हा वारसा घेऊन पर्यटनाला चालना मिळू शकते. यासाठी शहराचा इतिहास नवीन पिढी पर्यंत जाण्याची गरज असल्याची भावना उद्योजक नरेंद्र फिरोदिया व्यक्त केली.
शहराच्या 529 व्या स्थापना दिनानिमित्त हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ (कबर) असलेले बागरोजा येथे चादर अर्पणाच्या कार्यक्रमाप्रसंगी फिरोदिया बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके, हरजितसिंह वधवा, हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, अभिजीत वाघ, भूषण देशमुख, उबेद शेख, बहिरनाथ वाकळे, आबिद दुलेखान, कर्मयोगी प्रतिष्ठानचे शफी जहागीरदार, पक्षीमित्र डॉ.सुधाकर कुऱ्हाडे, आसिफ दुलेखान, संध्या मेढे, कॉ.महेबुब सय्यद, शिरीष कुलकर्णी, साहित्यिक चंद्रकांत पालवे, नफिस चुडीवाला, संजय सावंत, अजमत इराणी, अन्सार सय्यद, राजेंद्र येंडे, अकलाख शेख, जुनेद शेख, आफताब शेख आदिंसह इतिहास प्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात उबेद शेख यांनी शहराच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा देत चांदबीबीची कारकीर्द, निजामशाही ते मोघलकालीन इतिहास सांगितला. तसेच ब्रिटीश राजवट ते स्वतंत्र्य भारताच्या इतिहासाशी जोडले गेलेले अहमदनगर शहराचे महत्त्व विशद केले. भुषण देशमुख यांनी उपस्थितांना अहमदनगर शहराच्या वैभवशाली इतिहासाची माहिती देवून, बागरोजा येथील ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व व त्याच्या स्थापत्यकलेबद्दल सांगितले. तर हा ऐतिहासिक वारसा जपला गेला तर भावी पिढीला यापासून बोध घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमोल बागुल यांनी बासरी वादनाने अहमद निजामशहा यांना श्रध्दांजली वाहिली. बहिरनाथ वाकळे यांनी इतिहास मनोरंजनासाठी नसून, भविष्यकाळातील चुका टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. इतिहासाने भविष्यात प्रेरणा व ऊर्जा मिळत असते. इतिहासात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडीत असताना, हा बोध घेऊन जातीय सलोखा प्रस्थापित होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संदिप मिटके यांनी शहर स्थापना दिनाचे नगरकरांना शुभेच्छा दिल्या. पक्षीमित्र सुधाकर कुऱ्हाडे यांच्या पक्ष्यांची सुची असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सनई चौघड्यांचा निनाद तर आकर्षक रांगोळींनी बागरोजा परिसराचे वातावरण प्रसन्न व प्रफुल्लीत झाले होते.
स्थापना दिनाच्या कार्यक्रमांना प्रतिसाद
शहर स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या दोन दिवसांपासून करण्यात आले.त्यात भिस्त बाग परिसरात आयोजित केलेल्या आल्हाद काशीकरांच्या गझलांच्या महफीलीला, तसेच किल्ला परीसरात आयोजित हेरीटेज वॉकला, तसेच बागरोजा येथील हेरीटेज वॉकला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला