हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर बोरीसावंत शिवारात एसटी महामंडळाची बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
आंबाजोगाई आगाराची चंद्रपूर-अंबाजोगाई (क्र.एमएच-09-एफएल-1020) हि बस मंगळवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर बोरीसावंत शिवारात आली असताना समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बसला ओव्हरटेक केले. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान दाखवून बस बाजूला घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र यामध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, या प्रकाराची माहिती एका कारचालकाने रिपाईचे पदाधिकारी किरण घोंगडे यांना दिली. त्यांनी तातडीने या बाबतची माहिती गावकरी व हट्टा पोलिसांना दिल्यानंतर हट्टा तावडे, जमादार शेषराव लाखाडे, सय्यद खतीब, शेख मदार, राजेश ठाकूर, आंबादास बेले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बस बाहेर काढले.
या अपघातात सुमारे 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नारायण सुरपान , अश्विनी नारायण सुर्पण,पुष्पलता नारायण सुरपान , दीपक चिद्रवार , मंगल चिद्रवार , आशिष भंडारी , सतीश गंध , मिथुन बावरी , तरुण बावरी, डुलाल बावरी , प्रवीण धीमाधम, संतोष नागरे, आदी बहुतांश प्रवाशांना किरकोळ दुखापत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी वाहनाने हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.