पालघर: पालघर मधील 51 हजार शेतकऱ्यांना 21 कोटी 9 लाख रूपयांची दुष्काळी मदत पोचवण्यात आली आहे अशी माहिती आज सरकारी सूत्रांनी दिली. गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने या जिल्ह्यात मोठी टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 22 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 333 गावांतील 51 हजार 174 शेतकऱ्यांना 21 कोटी 9 लाखांची आर्थिक मदत वितरीत करण्यात आली आहे. राज्याच्या आदिवासी विभागाचे प्रिंसीपल सेक्रेटरी मनिषा वर्मा यांनी राज्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करून पाणी टंचाई आणि अन्य टंचाई स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नमूद केले की या कामी सरकार पैसा कमी पडू देणार नाही. पाणी टंचाई ग्रस्त गावांना तातडीने पुरेसा पाणी पुरवठा करण्याचा आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.