नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर लवकर सुनावणी करण्यात यावी यासाठी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर आज सकाळी साडे दहा वाजल्यापासून ही सुनावणी होणार आहे. याप्रकरणी काही ठोस प्रगती होत नसल्याने लवकर सुनावणी व्हावी असे हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी म्हटले आहे. याआधीच्या सुनावणीतील कमेटीने मध्यस्थी करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. न्यायालयाने या कमेटीला 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला होता.
माजी न्यायाधिश एफएम कलीफुल्ला, धर्मगुरु श्रीश्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचु यांना मध्यस्थी म्हणून नियुक्त करण्यात आले. याप्रकरणाचा सर्व बाजुंनी विचार करुन, सर्वांशी बोलून यावर आपले विचार मांडण्यास यांना सांगण्यात आले होते. 4 आठवड्यात या मध्यस्थीने वाद मिटवण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर आठ आठवड्यात ही संपावी असेही न्यायालयाने म्हटले आहे.