अॅप अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे, अशी इंग्रजीत एक म्हण आहे. आपणा सर्वांना ती माहीत आहे. अॅप अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे, म्हणजे जर तुम्ही दररोज एक अॅपल म्हणजे सफरचंद खाल्ले, तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणारच नाही. म्हणजे तुमची प्रकृती एकदम खणखणीत राहील. उत्तम राहील.
आता ही इंग्रजी म्हण आपणा सर्वांना अगदी लहानपणापासूनच माहीत आहे. पण अशा म्हणी आपल्या मायबोलीत-मराठी भाषेतही आहेत. सर्वच भाषांमध्ये असतीलच यात काही शंका नाही. तर पाहू अशा आरोग्यवर्धक माहिती देणाऱ्या आपल्या मराठी म्हणी, या सर्व म्हणींमध्ये जे पदार्थ आलेले आहेत, ते अत्यंत आरोग्यदायी आहेत. उदाहणार्थ गाजरच पाहा.
गाजरामध्ये अ जीवनसत्त्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते. नियमितपणे गाजर खाल्ल्याने जठरांमध्ये होणारा अल्सर आणि पचनाचे विकार टाळले जातात.गजरामध्ये आम्ल घटक असतात जे शरीरातील आम्लाचे प्रमाण संतुलित करून रक्त शुद्ध करते. गजरामध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब वाढवण्यास मदत करते. गजर खाल्ल्यामुळे तोंडातील हानिकारक किटाणूंचा नाश होतो आणि दात किडण्यापासून टाळता येतात. भाजलेल्या ठिकाणी किंवा जखम झालेल्या ठिकाणी गाजर किसून लावल्यास त्रास कमी होतो. गजरामध्ये कॅरोटीनॉड्स असतात जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. नियामितपने गजर खाल्ल्यामुळे केस, डोळे आणि त्वचा यांचे आरोग्य सुधारते त्याच्या बरोबरचा मुळा- मुळ्यात प्रथिने, कर्बोदके, फॉस्फरस आणि लोह असते. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो. जेवणात कच्चा मुळा खावा. कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न व्यवस्थित पचते.
या सर्व गोष्टींमुळे गाजर व मुळा खावेत यासाठी पुढील म्हण केलेली आहे.
1) खाल गाजर, मुळे तर होतील सुंदर डोळे.
मोड आलेल्या कडधान्यांचे महत्त्व आपल्याला माहीत आहे. त्यामुळे सकाळच्या नाष्ट्यामध्ये मोड आलेल्या धान्यांचा समावेश करण्यासाठी पुढील म्हण आलेली आहे.
2) सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त.
डाळभात किंवा वरणभात हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक. पण तूर डाळ व काही प्रमाणात चणा डाळीशिवाय इतर डाळींचा वापर आपला आहारात केला जात नाही. कारण डाळी पचायला जड असल्याचा समज असल्यामुळे पुष्कळ जण डाळींचे पदार्थ कमीच खातात. हरभऱ्याच्या (चण्याच्या) डाळीशी तर अनेकांचे अगदी वाकडेच असते. पण प्रत्येक डाळीत शरीराला चांगले असे अनेकविध गुण आहेत.
डाळींचा रोजच्या जेवणातला उपयोग फक्त आमटी किंवा वरणापुरताच मर्यादित नक्कीच नाही. अर्थात या आमटी आणि वरणाचेच कितीतरी प्रकार करता येतात. दोन-तीन डाळी एकत्र करून किंवा फोडणीत वेगवेगळ्या भाज्या घालून रोजचे वरणही चवदार करता येते. कढी, डाळींचे पीठ पेरलेल्या भाज्या, पीठ लावून केलेली ताकातली भाजी, ढोकळा, धिरडी, घावन, डाळींचे सूप असे इतर पदार्थ आहेतच की. शिवाय आपल्याकडे डाळींचे पुरण, डाळींचा हलवा, डाळीच्या रव्याचा शिरा, लाडू अशा गोड पदार्थाचीही वानवा नाही. प्रश्न इतकाच आहे की आपण रोजच्या आहारात डाळ वापरतो का? डाळी पचायला जड असल्यामुळे अनेक जण डाळींपासून दूर राहणेच पसंत करतात. फार-फार तर तूरडाळ किंवा मूगडाळीच्या पुढे जात नाहीत. पण डाळींचे अनेक चांगले गुण आहेत. डाळीत असलेली प्रथिने शरीरातील स्नायूंना बळकटी देतात. डाळींमध्ये जस्त (झिंक), तंतुमय पदार्थ आणि शरीरात नैसर्गिकरीत्या तयार न होणारी अमिनो आम्लेही असतात. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ या आपल्या आहारातील मुख्य डाळी आहेत. वरण आमटीप्रमाणे व भाज्यांमध्ये डाळींचा वापर करण्याप्रमाणेच डाळींचे सूप चांगले होते, आरोग्यदायी असते. विशेषत: लहान मुलांसाठा तर हे सूप फारच उपयुक्त असते. ही गोष्ट पुढील म्हणीत सांगितली आहे.
3) डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप.
तेव्हा केवळ ऍन एपल अ डे एवढी इंग्लिश म्हण लक्षात ठेवू नका. म्हणजे ती ठेवा, ती चांगलीच आहे. पण आपल्या मराठी भाषेतील म्हणींकडेही दुर्लक्ष करू नका, त्या पाहा आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. त्यात आपलाच फायदा आहे.
अश्विनी महामुनी