कोल्हापूर येथील “ब्रेनडेड’ तरुणाच्या हृदयाचा पुण्यापर्यंत प्रवास
पुणे – कोल्हापूर येथील “ब्रेनडेड’ 18 वर्षीय तरुणाने हृदय आणि मूत्रपिंड दान करत तिघांना जीवनदान दिले. “ग्रीन कॉरिडॉर’च्या सहाय्याने अवघ्या 2 तास 20 मिनिटांत कोल्हापूर पुण्यात हृदय आणून डॉक्टरांनी भिगवण येथील 30 वर्षीय शेतकरी तरुणावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. तर, एक मूत्रपिंड कोल्हापूरमधील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, तर दुसरे मूत्रपिंड पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला प्रत्यारोपणासाठी देण्यात आले. मंगळवारी (दि. 11) पहाटे हे प्रत्यारोपण करण्यात आले.
हदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.मनोज दुराईराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे दोन दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तेथील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तरुणाला सोमवारी (दि. 10) रात्री त्याला “ब्रेनडेड’ घोषित करण्यात आले. त्याबाबत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांना माहिती मिळताच, डॉक्टरांची एक टीम कोल्हापूरला रवाना झाली. त्यानंतर 18 वर्षीय दात्याचे हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी पहाटे 5 वाजता ग्रीन कॉरिडॉरद्वारे हृदय पुण्याच्या दिशेने निघाले. अवघ्या 2 तास 20 मिनिटांत हृदय पुण्याला पोहोचले.
त्यानंतर 30 वर्षीय शेतकऱ्यावर पहाटे 5 वाजता शस्त्रक्रिया सुरू झाली. ती तब्बल 6 तास चालली. आता तो रूग्ण स्थिर आहे. दरम्यान, सह्याद्री रूग्णालयातील हे दुसरे प्रत्यारोपण आहे, अशी माहिती युनिट प्रमुख डॉ. केतन आपटे यांनी दिली.
ही शस्त्रक्रिया हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांच्या मार्गदर्शनानुसार, भूलतज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, हदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेश कौशिष, डॉ. तडस, हृदय भूलतज्ज्ञ डॉ. सुहास सोनवणे, डॉ. सौरभ बोकील व परफ्युशनिस्ट प्रशांत धुमाळ आणि टीम यांचा समावेश होता. आरती गोखले यांच्या नेतृत्वाखाली झेडटीसीसीचे समन्वयनक डॉ. स्वाती निकम, वाहतूक पोलीस यांचे सहकार्य मिळाले.
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि…
कोल्हापुरातील ग्रामीण भागात राहणारा 18 वर्षीय तरुण नुकताच दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. घरची परिस्थिती गरीब, वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊन आई-वडिलांच्या कष्टाला हातभार लावायचा. त्यांना सुखात ठेवण्याचे स्वप्न तरुणाचे होते. मात्र, काळाने घाला घातला आणि तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली होती.