खटाव – खटाव परिसरात आज अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला. यामुळे फळबागांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. गारपिटीमुळे सर्वत्र गारांचा खच पडला होता. खटाव परिसरात गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली होती. भूजल पातळी देखील कमालीची खालावली आहे. वातावरणात उष्मादेखील मोठ्या प्रमाणात जाणवत होता. खटाव परिसरातील लोक उष्णतेने हैराण झाले होते. आजू बाजूला पावसाने हजेरी लावली होती.
परंतु खटाव परिसरात पाऊस हुलकावणी देत होता. आज दुपारी वातावरणात कमालीचा बदल जाणवला.
अंगाची लाही-लाही करणारे ऊन अचानक ढगाळ वातावरणामुळे गायब झाले. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. सोसाट्याचा वारा व ढगांतून गारा बरसू लागल्या. बाल गोपाळांनी पावसात भिजण्याबरोबर गारा गोळा करून खाण्याचा आनंदही लुटला. या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात बळीराजा सुखावला पण गारपिटीमुळे फळबागांचे उत्पन्न घेणारा शेतकरी हवालदिल झाला आहे.