श्रीगोंदा: दुष्काळामुळे सर्वत्र टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असल्याने प्रत्येकाने मुक्या जीवांचा विचार करावा, या भावनेतून येथील आळेकर व खेतमाळीस कुटुंबियांनी लग्नात तांदळाचे अक्षता न टाकण्याचा निर्णय घेतला. हे अक्षतारुपी धान्य पशु-पक्ष्यांसाठी वनविभागाकडे जमा केले.
येथील रत्नकमल मंगल कार्यालयात महेश आळेकर व अनिता खेतमाळीस यांचा विवाह पार पडला. यामध्ये तांदळाच्या अक्षताऐवजी फुलांच्या अक्षता ठेवण्यात आल्या. आळेकर व खेतमाळीस कुटुंबियांनी वन कर्मचाऱ्यांना या सोहळ्यास बोलविले. अन् त्यांच्याकडे अक्षताचे वाचलेले धान्य पशु- पक्ष्यांसाठी दान केले. मुक्या जीवांचे आशीर्वाद वधू-वरास यशाच्या शिखरावर घेऊन जातील असा विश्वास यावेळी ज्येष्ठ नेते पोपट खेतमाळीस यांनी व्यक्त केला.
हे धान्य आळेकर व खेतमाळीस कुटुंबियांच्यावतीने पोपट खेतमाळीस, माजी नगराध्यक्ष संतोष खेतमाळीस, माजी नगराध्यक्ष सुनीता शिंदे, श्रीगोंदा सोसायटीचे चेअरमन अशोक आळेकर, नगरसेवक शाहजी खेतमाळीस आदींच्या हस्ते वन कर्मचाऱ्यांना देण्यात आले.