पारनेर: खरीप हंगाम 2018 मध्ये डाळिंबाचा मृग बहर व इतर फळ पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरविला होता. परंतु अनेक शेतकरी या विम्यापासून वंचित आहेत. संबंधित विमा कंपनीकडे याबाबत विचारणा केली असता, विमा हप्ता बॅंकेकडून मुदतीत न आल्याने विमा रक्कम मंजूर केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची कुठलीही चूक नसताना ते पीकविम्यापासून वंचित आहेत. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.
सदर योजनेमध्ये 10 हजार 19 कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यातील 9 हजार 448 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे. उर्वरीत 571 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. तसेच एकूण 7 हजार 956 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या याजनेत सहभाग घेतला असून, त्यापैकी फक्त 65 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त झालेली आहे. उर्वरित 7 हजार 891 बिगर कर्जदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. संबंधित बॅंकांनी वरील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांची विमा हप्ता रक्कम विमा कंपनीकडे पाठविलेली आहे.
सदरची रक्कम विमा कंपनीने स्वीकारलेली असून, त्याची माहिती शासन पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता होऊनही नगर जिल्ह्यातील शेतकरी विमा रकमेपासून वंचित राहिलेले आहेत.
शेतकऱ्यांच्या वतीने सभापती प्रशांत गायकवाड यांनी पुणे येथे विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन विमा कंपनीचे अधिकारी शशिकांत भोसुरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार भोसुरे यांनी विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करुन केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील असे सांगितले. यासाठी सभापती गायकवाड पुढील आठवड्यात नवी दिल्ली येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन भेट घेणार आहेत.