नवी दिल्ली – देशात कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे कांद्याची निर्यात रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील सर्व सवलती रद्द केल्या आहेत.
गेल्या वर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यामुळे कांद्याचे भाव पडले होते. या कांद्याची निर्यात व्हावी याकरिता गेल्या वर्षी केंद्र सरकारने निर्यातदारांना काही सवलती दिल्या होत्या. मात्र त्या सवलती आता काढून घेण्यात येत असल्याचे परिपत्रक परकीय व्यापार महासंचालनालयाने जारी केले आहे.
त्यामुळे आता निर्यातदारांना कसल्याही आर्थिक सवलती मिळणार नाहीत. चालू वर्षात पावसाळ्याची सुरुवात होऊन बरेच दिवस झाले असले तरी कांदा उत्पादन करणाऱ्या अनेक राज्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे खरिपात कांद्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. ही बाब ध्यानात घेऊन केंद्र सरकारने अगोदरच 50 हजार टन कांद्याचा साठा तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच आता निर्यातीवरील सवलती रद्द करण्यात आलेल्या आहेत.
लासलगाव येथील कांद्याच्या घाऊक बाजारपेठेत कांद्याचे भाव एका महिन्यात 48 टक्क्यांनी वाढलेले आहेत. सध्या कांद्याचा भाव 13.30 रुपये प्रति किलो चालू आहे. नवी दिल्लीत कांद्याचे भाव 20 ते 25 रुपये प्रति किलो या पातळीवर गेलेले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात पाऊस कमी पडल्यामुळे सरकारने या उपाययोजना केल्या आहेत. सरलेल्या वर्षात कांद्याचे उत्पादन 23.62 दशलक्ष टन झाले होते. मात्र यावर्षी यात घट होण्याची शक्यता सध्या तरी निर्माण झालेली आहे.