नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी यावरून लोकसभेत पुन्हा एकदा राहुल गांधी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यासाठी त्यांनी वायनाडमध्ये शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचे उदाहरण दिले. तसेच इथल्या हजारो शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम न भरल्याचे सांगत बॅंकांनी त्यांना नोटीसा बजावल्याचे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला.
केंद्रातील सरकार हे गरीब शेतकऱ्यांची वेळोवेळी दिशाभुल करत आले आहे आणि आतादेखील सरकारने हेच केले असल्याचा आरोपदेखील राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी सरकारच्या पहिल्या सरकारने शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली त्याची पुर्तता आतापर्यंत सरकारने केली नसल्याचे सांगत राहुल गांधी यांनी मागील 5 वर्षात केंद्र सरकारने श्रीमंत असणाऱ्या व्यावसायिकांचे तब्बल 5.5 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले मात्र गरीब शेतकऱ्यांच्या कर्जाच्याबाबतीत कठोर निर्णय सरकारकडून घेण्यात येत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या आरोपांना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी उत्तर दिले. मागील पाच वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक विकासाजनक कामे केल्याचे सांगत राजनाथ सिंग यांनी कॉंग्रेसला धारेवर धरले. तसेच अनेक पिकांचे हमीभाव वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 20 ते 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले असल्याचेही सिंग यांनी यावेळी म्हटले.