सोयाबीन उत्पादकांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई द्या
बीड: कृषी विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. बीड जिल्ह्यातील सुमारे बारा लाख शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. उन्हाळी मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असून पात्र विमा धारक शेतक-यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, कृषी संचालक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे याबाबतची लेखी मागणी मुंडे यांनी केली आहे.
शासनाने केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. पेरणीपूर्वी उन्हाळी मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. अशा परिस्थितीत ज्या शेतक-यांनी विम्याचा हप्ता भरला आहे अशा पात्र शेतक-यांना पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम वेळेत मिळाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला आहे.