अशोक सुतार
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशभरातील जनतेने पुन्हा सत्तेसाठी कौल दिला आहे. जनतेने भाजप व रालोआवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्रातील रालोआ सरकारवर जनतेने टाकलेली जबाबदारी लक्षात घेऊन सरकारने यापुढे अधिकाधिक लोककल्याणाची कामे करावीत. तसेच देशाला विकासाकडे न्यावे व सत्तेच्या अहंकारापासून दूर राहून सत्तेचा दुरुपयोग करू नये, असा इशारा संघप्रमुख मोहन भागवत यांनी रालोआ सरकारला कानपूर येथे बोलताना दिला आहे.
कानपूरच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या संघप्रमुख भागवतांनी 600 स्वयंसेवकांना नुकतेच मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी रालोआ सरकारला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्या सरकारचे जनतेप्रती मोठे काम असून सरकारला मोठे अधिकार असतात; परंतु त्यांचा दुरुपयोग होऊ नये. रालोआ सरकारने जमिनीवर राहून मिळालेल्या सत्तेचा देशातील नागरिकांच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. अशा परिस्थितीत सरकारची पावले डगमगू लागली तर संघ त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून सल्ला व मार्गदर्शन करत राहील. केंद्रात मोदी सरकारने नुकतीच सत्ता स्थापन केल्यानंतर संघप्रमुख भागवतांनी रालोआस हा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. भागवत यांना मोदींच्या रालोआ सरकारला सल्ला का द्यावासा वाटला, हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे. भागवत यांनी सरकारला सल्ला दिला आहे की, कोणतेही काम करताना अहंकार ठेवू नका; अन्यथा मिळालेले सर्व काही अहंकारामुळे हिरावले जाऊ शकते. त्यांनी दिलेला सल्ला भाजप व मोदी यांनी अमलात आणण्याची गरज आहे.
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वास सुरुवात झाली आहे. गेल्या 45 वर्षांतील बेरोजगारीच्या दराने उच्चांक गाठला असून देशाच्या आर्थिक विकासाच्या दराने गेल्या पाच वर्षांतील नीचांक गाठल्याचे यातून स्पष्ट झाले. बेरोजगारीचा दर आहे 6.1 टक्के आणि देशाच्या अर्थविकासाची गती 5.8 टक्के इतकी आहे. चिनी अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा पाच पटींनी मोठी आहे. आता आपण चीनच्या मागे पडलो आहोत. त्यात भरीस भर म्हणून व्यापार उद्दिमात भारताचा विशेष दर्जा अमेरिकेने काढून घेतला. मोदी सरकारने अलीकडे ऑनलाइन उद्योगांतील गुंतवणुकीवर मोठे निर्बंध लादले. या प्रकारच्या सरकारी मदतीने देशांतर्गत कंपन्यांना फायदा होणार असला तरी जागतिकीकरण प्रक्रियेतील जागतिक व्यापार संघटनेतील विदेशी कंपन्यांना ते त्रासदायक ठरणार आहे, बाजारातील संतुलन बिघडणार आहे. त्यामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
भारताची एवढी पीछेहाट होत असताना संघाने मात्र पुन्हा सत्तेत आलेल्या केंद्र सरकारला खडसावले आहे. अर्थात, केंद्र सरकारने योग्य निर्णय घ्यावेत, यासाठी काही इशारे दिले आहेत. केंद्र सरकार भागवत यांचे इशारे गंभीरपणे लक्षात घेईल, अशी आशा आहे. तेच केंद्र सरकारच्या भल्याचे आहे. केंद्र सरकारचे मागील टर्ममध्ये अर्थक्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. एकही ठोस धोरण न राबवल्याने बाजारपेठेत गुंतवणूक मंदावली आहे. आर्थिक सुधारणांच्या प्रतीक्षेत बॅंक आणि वित्तीय क्षेत्र आहे, याचे भान सरकारने ठेवले पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अत्यंत खुली कार्यपद्धती असल्याचे विवेचन मोहन भागवत यांनी एक वर्षांपूर्वी केले होते. ते दिल्लीत झालेल्या संघाच्या अधिवेशनात म्हणाले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांत लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात एकाधिकारशाही चालत नाही. या भाषणात भागवत यांनी नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. तत्कालीन सरकारला दिलेला तो इशारा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीबद्दल भागवत म्हणाले होते की, संघ हा सर्व लोकयुक्त विचारांचा आहे. आम्ही मुक्त विचारांचे नाही, असे म्हणत भागवत यांनी सत्तारूढ भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाचा समाचार घेतला होता. त्या भाषणात भागवत यांनी विरोधी पक्षाला कमकुवत समजण्याची चूक करू नका, असे सांगितले होते. सतत कॉंग्रेसला लक्ष्य करणाऱ्या आणि गेल्या 60 वर्षांत देशात काहीच झाले नाही, असे सांगणाऱ्या मोदींना भागवतांनी, कॉंग्रेसचा देशाच्या इतिहासात किती मोलाचा वाटा आहे, हे भाषणातून समजावून सांगितले होते. मोदी आणि अमित शहा यांनी यातून काय घ्यावे आणि काय नाही, हा त्यांचा प्रश्न आहे.
संघाचे स्वयंसेवक असलेल्या मोदींची प्रतिमा सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी, राममंदिर उभारणारा, अल्पसंख्याकांचा विरोधक आणि विकास-पुरुष अशी निर्माण करण्यात आली होती. मात्र पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी आपली प्रतिमा बदलून लोकशाही व कल्याणकारी राज्यास प्राधान्य दिले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींमधील हा बदल स्वागतार्ह आहे. यामुळे जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे.
आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या मोदींच्या दाव्यांबाबत संघ नेत्यांनाही उत्तरे देताना अडचण येत आहे. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीच्या कार्यक्रमात म्हटले होते की, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कॉंग्रेसचे मोठे योगदान होते.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला त्यामुळे देशाला अनेक नेते मिळाले. तिरंग्याचा व स्वातंत्र्याच्या सर्व प्रतीकांचा संघ सन्मान करतो. भाजपला पुन्हा सत्ता मिळाली आहे, याचा आनंद मोहन भागवत यांना आहेच. परंतु मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वात शहाणपणाने निर्णय घ्यावेत, मागील चुका सुधाराव्यात आणि जनतेच्या विकासाला केंद्रीभूत मानून राज्यकारभार करावा, अशी अपेक्षा भाजपच्या मातृसंघटनेकडून व्यक्त केली जात आहे. भागवत यांनी दिलेला सल्ला मोलाचा असून केंद्र सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वात मागील चुका सुधारणे अपेक्षित आहे.