पणजी : गोव्यात सुरू असणाऱ्या राजकिय घडामोडींवर सर्वच स्तरातून बोलले जात आहे. त्यात आता राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलानेही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या वडीलांच्या राज्यातील गोवा भाजपची वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे उत्पल यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील सध्याची राजकिय परिस्थिती आपल्या वडिलांच्या विचारांच्या पुर्णपणे विरोधात असून वडिल असते तर त्यांनी हा मार्ग कधीच निवडला नसता असेही उत्पल यांनी सांगितले.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उत्पल यांना तिकिट न देता कुंकळयेकर यांना तिकिट देण्यात आले. त्यांचा कॉंग्रेसच्या बाबूश मोन्सेरात यांनी पराभव केला होता. परंतु, मोन्सेरात यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेक भाजपवासियांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यासर्व परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत उत्पल यांनी 17 मार्च रोजी आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी घडवलेला गोवा भाजप याचादेखील अंत झाल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच 17 मार्च रोजीच भाजपचा विश्वास आणि वचनबद्धता या शब्दांचा अर्थ काहीच उरलेला नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.