गुजरात सरकारने जारी केला हाय अलर्ट
मुंबई – केरळात मान्सून सक्रिय झाल्यानंतर लवकरच इतर राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन होणार होते. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “वायू’ चक्रीवादळामुळे मान्सुन आठवढाभर पुढे धडकला गेला असुन हे चक्रीवादळ हे कोकण किनारपट्टीवर आज धडकणार होते. मात्र, आता हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेला सरकले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला चक्रीवादळाचा फटका बसणार नाही. मात्र, या चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दबाव क्षेत्रामुळे “वायू’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. 13 जून रोजी गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर तसेच पोरबंदर, कच्छ या भागांत ते धडकेल असा अंदाज आहे. पुढील 24 तासांत चक्रीवादळाचा वेग आणखीन वाढेल आणि परिस्थिती आणखीन गंभीररूप निर्माण करेल अशी शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 130 किमी इतका असू शकतो.
गुजरातमध्ये हाय अलर्ट
‘वायू’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार आहे. तसेच येत्या काळात वादळाचा वेग आणखीन वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुजरात सरकारने हाय अलर्ट जाहीर केला असून किनारपट्टीवर एनडीआरएफ, नौदलाचे 50 पथके तैनात करण्यात आले आहेत. तर, 10 सेनादलाच्या तुकड्यांना देखील सज्ज राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच नागरिकांना, मच्छिमारांना सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे गुजरात मधील सौराष्ट्र आणि कच्छ भागातील जवळपास 1 लाख 60 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याच बरोबर रेल्वे स्थानक आणि विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याची माहिती देखील गुजरात सरकारच्या प्रवक्त्यआंनी दिली आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर गुजरात मधील 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असुन लोकांना महत्वाच्या कामा व्यतिरीक्त घरा बाहेर पडू नका अशा सुचना देखील करण्यात आल्या आहेत.