नवी दिल्ली – करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत पैशांच्या स्वरुपात करण्यात आलेले दान महत्त्वाचे आहे. हे दान किती रकमेचे आहे ते महत्त्वाचे नाही, अशा शब्दात माजी कसोटी क्रिकेटपटू व खासदार गौतम गंभीर याने आपले मत व्यक्त केले आहे.
देशात करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोकांना रोज दोन वेळच्या जेवणाचा बंदोबस्त करणे देखील कठीण जात आहे. अशा वेळी देशातील उद्योगपती, खेळाडू तसेच समाजातील सर्व स्तरांवरील लोक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. या वेळी तुम्ही किती मदत करता किंवा किती रुपयांचे दान करता हे महत्त्वाचे नाही तर प्रत्यक्ष दान देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दिलेला एक रुपया देखील सार्थकी लागणार आहे, असेही गंभीर म्हणाला.
देशातील सद्यस्थिती पाहिली तर करोनाविरुद्धचा लढा लढण्यासाठी देशवासियांनी पुढे येत मदत केली पाहिजे. अर्थात लोकांनी रस्त्यांवर उतरु नये तर आपापल्या घरात राहूनही मदत कार्याला हातभार लावता येतो. देशातील कोणत्याही व्यक्तीने केलेले दान कोणच्या तरी आयुष्यात दिलासा देणारे ठरणार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने केवळ एक रुपया जरी दान केले तरी ते महत्त्वाचे आहे, असेही गंभीरने स्पष्ट केले.