हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
चेन्नई /नवी दिल्ली – हिंदी महासागराच्या पूर्व भागात तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात हा दाब वाढणार असून त्यानंतरच्या 12 तासात या भागात वादळ येण्याची शक्यता आहे. बांगलादेशने सुचवल्यानुसार या वादळाला “फणी’ असे नाव देण्यात आले आहे. “फणी’ वादळ सध्या हिंद महासागरात विषववृत्ताजवळ आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्वेकडील भागाजवळ आहे.
येत्या काही दिवसात हा पट्टा श्रीलंकेच्या किनाऱ्यावरुन तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल, यामुळे येत्या 30 एप्रिल आणि 1 मे ला आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूच्या काही भागात आणि केरळमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रीलंका, तामिळनाडू आणि आंध्रच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यालाही या वादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.