बेंगकुलू (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूराने थैमान घातले असून आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. किमान डझनभर लोक अजूनही बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. सुमात्रा बेटावरच्या बेंगकुलू प्रांतामध्येच 29 जण मरण पावले आहेत. शेजारील लॅम्पुंग प्रांतात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान पूरामुळे राजधानी जकार्तामध्ये गेल्या आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला. तर किमान 2 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. इथल्या नागरिकांनी चक्क पाळलेले 14 अजगर पूरामुळे सुरक्षित ठेवणे अवघड बनले होते. त्यामुळे या अजगरांना मोकळे सोडून देण्यात आले आहे. बोगोर येथे या अजगरांनी काही नागरिकांवर हल्ला केला. काही ठिकाणी साप आणि अन्य धोकादायक जलचरांनी नागरीवस्तीमध्ये आढळून आले आहेत.
बेंगकुलू प्रांतातील किमान चार प्रमुख नद्यांना पूर आला आहे. सुमात्रामध्ये सुमारे 12 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. अनेक इमारती, पूलांना या पूरामुळे धोका उत्पन्न झाला आहे. तेगाह जिल्ह्यात कोळशाच्या अवैध खाणीमुळे भूस्खलन झाल्याची घटनाही घडल्याने 22 जणांचामृत्यू झाला.