-योगिता जगदाळे
ऋतुमानानुसार बाजारात येणारी अशी फळे केवळ आरोग्यवर्धकच असतात असे नाही, तर ती सौंदर्यवर्धकही असतात. ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फक्त त्यांचा वापर करता आला पाहिजे.
कैरी : उन्हाऴा आणि त्यातही मे महिना म्हणजे आंब्याचा मोसम. पण उन्हाळा सुरू झाला की अगदी जानेवारी महिन्यापासूनच बाजारात आंबे दिसू लागण्यापूर्वी विक्रीसाठी कैऱ्या यायला लागतात. चवीला अगदी आंबटढाण असलेल्या या कैऱ्या सुरुवातीला थोड्या महाग असल्या तरी त्या तुमची त्वचा मुलायम आणि कांतिमान बनवण्यास मदत करतात. एक कैरी उकळवून तिचा गर चेहरा, गळा, मानेवर चोळा आणि वाळल्यावर धुवा. कैरीचा गर असा उकडून लावल्यामुळे त्वचा मुलायम राहतेच, पण घामोळ्या येण्यावरही आळा बसतो.
काकडी : हिरवीगार काकडी ही थंडाव्यासाठी जाणली जाते. मीठ लावून काकडी खाण्याप्रमाणेच काकडीची कोशिंबीरही सर्वजण आवडीने खातात. याच काकडीचा उपयोग त्वचा ब्लीच करण्यासाठी होतो. त्यासाठी काकडीचा रस काढावा आणि तो हळुवारपणे चेहऱ्यास चोळावा. त्याचा परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाही. काकडीचा रस काढायचा कंटाळा आला, तर चेहऱ्यावर काकडीच्या फोडी करून ठेवा आणि पंधरा-वीस मिनिटांनी फोडी काढून टाकून चेहरा स्वच्छ धुवा.
डाळींब : पिकलेल्या डाळिंबाचे लालबुंद दाणे जणू पाहणाऱ्याला निमंत्रणच देत असतात. खाण्याव्यतिरिक्त त्यांचा सौंदर्यवृद्धीसाठीही उपयोग आहे. डाळिंबाचे लालबुंद दाणे चेहऱ्यावर दररोज चोळा. त्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग हलका आणि गुलाबी होण्यास मदत होईल ओठांवरूनही त्याचा रस फिरवा, ओठांचा रंग सुधारेल व ओठ रसरशीत दिसतील. चेहऱ्यावरील डाग असल्यास ते घालवण्यासाठी डाळिंबाची साल कच्च्या दुधात वाटा आणि ती पेस्ट चेहरा, मानेवर लावा सुकल्यावर धुवा.
पपई : फार पूर्वीपासून पपईचा गर उपयुक्त सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरात आहे पपईचा गर चेहऱ्यावर चोळल्यास डाग, पुरळ कमी होण्यास मदत होते त्वचेचं आरोग्य सुधारतं.
नारळपाणी : नारळपाणी नियमितपणे चेहऱ्यावर लावा त्यानं चेहऱ्यावरील डाग, राप निघून जाण्यास मदत होते.
केळी : केळी हे मोसमी फळ नाही. ते वर्षभर उपलब्ध असते. ते देखील सौंदर्यवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. चांगल्या पिकलेल्या केळ्याचा गर आणि मलईचा पॅक तयार करून तो चेहऱ्यावर लावा. सुमारे 15-20 मिनिटे तो तसाच ठेवा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. मधात बुडवून ठेवलेल्या पिकलेल्या केळाच्या पातळ चकत्या तयार करून त्या चेहऱ्यावर लावा 15 मिनिटांनी चेहरा धुवा त्वचेचा कोरडेपणा जाऊन तिचं आरोग्य सुधारतं. चेहऱ्यावर पुटकुळ्या असतील तर त्या घालवण्यासाठी केळ्याचा गर चोळून तो अर्धा तास ठेवा. त्यानंतर कच्च्या दुधानं चेहरा धुवा.
सफरचंद : सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजलाचे थेंब घालून चेहऱ्यावर लावा किंवा सफरचंदाचा गर उकडवून तो लावा वाळला की चेहरा धुवा सावळा रंग उजळण्यास मदत होईल.
खरबूज : शुष्क त्वचेसाठी खरबुजाच्या गरात एक अंड्याचा पांढरा भाग आणि थोडी मिल्क पावडर घाला आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा.