कोलकाता: पश्चिम बंगाल मधील निवडणूक निकालाविषयी एक्झिट पोल मध्ये संमिश्र चित्र दर्शवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर तृणमुल कॉंग्रेसने आपल्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडे मतदानाच्या आकडेवारीचे अहवाल मागवून पक्षांतर्गत स्वरूपात या निवडणुकीचा आढावा घेण्याचे सत्र सुरू केले आहे. तृणमुल कॉंग्रेसने या आधीच एक्झिट पोलचे निकाल फेटाळून लावले आहेत. आम्ही प्रत्येक मतदार संघाचा अगदी तालुका व जिल्हा पातळीवरून आढावा घेत आहोत त्यानंतरच आम्ही आमचे निष्कर्ष जाहीर करू असे पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
निवडणुकीनंतरच्या स्थितीबाबतही अन्य पक्षांशी आमचा विचारविनीमय सुरू असल्याची माहिती या पक्षाच्या सूत्रांनी दिली. या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चीत होणार असून केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आमचा पक्ष निश्चीत मध्यवर्ती भूमिका बजावेल असे या नेत्याने सांगितले. याच अनुषंगाने पक्ष प्रमुख ममता बॅनर्जी आज चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करणार आहेत. ईव्हीएम मॅन्युप्युलेशन करण्यासाठी एक्झिट पोलही मॅनेज करण्यात आले आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी कालच केला होता. दरम्यान या निवडणुकीत तृणमुल कॉंग्रेसच्या विरोधात मोठा अंडरकरंट होता तो लक्षात घेण्यात पक्षाच्या नेतृत्वाला अपयश आल्याची भावना पक्षाच्या जिल्हा पातळीवरील काही पदाधिकाऱ्यांनी स्वताचे नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.