आचारसंहितेत नियुक्ती : निवडणूक आयोगाची परवानगी
पुणे – लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीतही राज्य शासनाच्या विविध विभागात अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
शासकीय सेवेत कार्यरत असताना कर्मचारी मृत पावल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येत असते. गेल्या काही वर्षांमध्ये ही पदे त्वरीत भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आताही ते चित्र कायम आहे. ही नोकरी मिळण्यासाठी संबंधित विभाग व शासनस्तरावर खूप पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी कार्यालयांमध्ये सतत हेलपाटे मारुन तळ ठोकावा लागतो. प्रयत्न करुनही बरीच वर्षे नियुक्त्या मिंळत नसल्याने बऱ्याचदा उमेदवारांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी निवेदने दिली व आंदोलनेही केली.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 1 मार्च 2014 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते. अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांसाठी “क’ व “ड’ या वर्गातील प्रतीवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 5 टक्के पदांच्या मर्यादा शिथील करुन ती प्रतीवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 10 टक्के इतकी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नियुक्त्या करण्यास मान्यता दिल्यामुळे आता तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ.द.जोशी यांनी राज्यातील सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.