शिराळा – विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मधील एफआरपी प्रमाणे होणारी सर्व रक्कम सुमारे 168 कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “विश्वास’ कारखान्याने 2018-19 च्या गळीत हंगामात कारखान्याच्या इतिहासात प्रथमच 5 लाख 93 हजार 61 मेट्रीक टन एवढे उच्चांकी गाळप केले. त्यातून 7 लाख 42 हजार 550 इतक्या शुभ्र, दाणेदार साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याने डिसेंबर अखेर एफआरपी नुसार प्रतिटन 2823 प्रमाणे होणारी रक्कम शेतकर्यांना यापूर्वीच आदा केली आहे.
डिसेंबर नंतरच्या गाळप उसाची रक्कम आता कारखान्याने 2823 प्रमाणे शेतकर्यांच्या खात्यवर पाठवली आहे. दोन दिवसात ती खात्यावर जमा होईल. त्यामुळे कारखान्याने गाळप केलेल्या 5 लाख 93 हजार 61 मेट्रीक टन ऊसाची होणारी एकून रक्कम सुमारे 168 कोटी रुपये कारखान्याकडून शेतकर्यांना आदा करण्यात आले आहेत. ते म्हणाले, कारखान्याने शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून प्रगती साधली आहे. सातत्याने ऊसाला उच्चांकी दर दिला आहे. सभासदांचे, हित डोळ्यासामोर ठेवून निर्णय घेतले आहेत. शिराळा व शाहूवाडी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना अनेक सोयी, सवलती, शेती मार्गदर्शन देत सातत्याने त्यांचे जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.