नवी दिल्ली – दिल्लीहून झाशीला जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (10 जून) चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उकाडा आणि गुदमरल्याने या प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या चारही प्रवाशांचे मृतदेह झाशी स्टेशनवर उतरवण्यात आले आहेत. आग्रा येथून 68 जणांचा एक ग्रुप कोईम्बतूरला जात होता, त्यात या चार प्रवाशांचा समावेश होता.
जून महिना सुरू झाला तरीही देशभरात उष्णतेची लाट मात्र कायम आहे. अजून एक आठवडा उत्तरेकडच्या राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणे कठीण आहे असे हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सून केऱळमध्ये पोहोचला असला तरी त्याचा उत्तरेकडचा प्रवास अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.
देशातील अनेक भागात तापमानाने कमाल मर्यादा ओलांडली असून पारा 45 ते 50 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील किनारी पट्टीलगतच्या भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.