पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत करोडो रुपये खर्चून उभारण्यात आलेले कारंजे देखभाल दुरुस्ती आणि पाण्याअभावी बंद बसताना पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात तब्बल चार कोटी 14 लाख रुपयांची उधळपट्टी करून नवे कारंजे उभारण्यात येणार आहेत. पूर्वी केलेला खर्च वाया गेलेला असताना ही उधळपट्टी कोणाच्या आग्रहावरून होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.
भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठविले असून त्यात म्हटले आहे की, पिंपळे गुरुव येथील जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत अवघ्या दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला.
कमीत कमी तीन ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक असल्याने नव्याने निविदा प्रक्रिया होणे गरजेचे होते. मात्र हा नियम डावलून नव्याने निविदा प्रक्रिया न करता ठेकेदाराला काम देण्यात आले. या निविदा प्रक्रियेत संगनमताने गैरप्रकार झाला असण्याची शक्यता असून या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.