पुष्य नक्षत्रातील गाढव वाहन करणार काय!
हिंगोली – रोहिणी नक्षत्रात कोल्हा या वाहनाने शेतकऱ्यांना चकवा दिला असता अचानक अवकाळी पाऊस बरसल्याने वीज वितरण कंपनीसह अनेक घरावरील पत्रे उडाले. तर उंदीर,हत्ती, मेंढा नक्षत्राने दगाबाजी केल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. आता पुष्य नक्षत्रातील गाढव वाहन बळीराजाला पोषक ठरणार असून समाधानकारक पाऊस पडणार असल्याची माहिती पंचांगकर्ते धोंडिराज पाठक यांनी दिली.
दरम्यान, 25 मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली, यात वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली. त्यानंतर मात्र वाहन कोल्हा असल्याने पाऊस पडलाच नाही. त्यानंतर 8 जूनला मृग नक्षत्र सुरू झाले यात वाहन उंदीर आल्याने पाऊस पडला नाही.22 जून नंतर आद्रा नक्षत्र लागले, यात चांगला पाऊस पडेल असे असताना हत्तीने दगा फटका दिला. परंतु काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्या होत्या.
रोहिणी नक्षत्र लागताच आकाशात मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट होऊ लागला, त्यातच फणी वादळानेही आपले कार्य चालू केले.शेतकऱ्यांनी शेती कामे लवकर उरकून रोहिणी नक्षत्र संपताच मृग नक्षत्र लागले. दरवर्षी या नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस होत असतो, परंतु मृगनक्षत्रानेही कोल्हा बनून शेतकऱ्यांना हुलकावणी दिली.
8 जूनला मृग नक्षत्र सुरू होऊन ते 22 जून पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत राहिल्या, पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. आद्रा नक्षत्र ही कोरडे गेले, त्यानंतर 6 जुलैला पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात झाली तेथेही मेंढा वाहन असलेल्या नक्षत्रानेही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. काही ठिकाणी तर पेरणीयोग्य पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी लांबणीवर पडू नये म्हणून धूळ पेरणी केली.
जिल्ह्यात 100 टक्के पेरणी झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या, परंतू तापमान 40अंशांवर गेल्याने हा ओलावा टिकून राहिला नाही. त्यामुळे जमिनीवर पिके डोलू लागली. परंतू पावसाने उघडीप दिल्याने यात मोठा खंड पडला. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पिके करपू लागली आहेत.
उंदिर, हत्ती आणि मेढ्याबरोबर गाढवाकडूनही निराशा
शेतकऱ्यांना उंदीर, हत्ती, मेंढा यांनी मोठा दगा दिला तर पुष्य नक्षत्रात वाहन गाढव असल्याने पाऊस पडेल अशी आशा शेतकरी राजा बाळगून होता. या गाढव वाहनानेही चक्क पाठ फिरवल्याने दहा दिवसांत पावसाला सुरुवात करून पिकांना जीवदान मिळेल, या आशेवर शेतकरी तग धरून बसला आहे. आता तर उन्हाळ्यासारखे चटके बसत असून अंगाची काहिली होत आहे. पुन्हा नागरिकांना कुलर, एसी सुरू करण्याची वेळ आली तरीही पाऊस पडण्याचा पत्ताच नाही. दीड महिन्याचा कालावधी उलटला, तरिही दमदार पाऊस पडला नसल्याने नदी, नाले यंदा खळखळ वाहिले नाहीत. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत चातक पक्षाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. ज्योतिष्य धोंडीराज पाठक यांनी ही भविष्यवाणी वर्तविली आहे.