नवी दिल्ली – जून महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात 11,132 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3 ते 14 जून या कालावधीत शेअरबाजारात 1,517 कोटी रुपयांची तर रोखे बाजारात 9,615 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. जागतिक वातावरण खराब असूनही या गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केली आहे. मात्र शेअरबाजाराऐवजी ह्या गुंतवणूकदाराचा रोखे बाजाराकडे कल असल्याचे दिसून येते.
मे महिन्यात या गुंतवणूकदारांनी 9,031 कोटी रुपयांची, एप्रिल महिन्यात 16093 कोटी रुपयांची, मार्च महिन्यात 45,981 कोटी रुपयांची तर फेब्रुवारी महिन्यात 11,182 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. जगातील काही प्रमुख देशांच्या रिझर्व्ह बॅंकांनी मवाळ पतधोरण जाहीर केल्यामुळे भांडवल सुलभता वाढली आहे.