मोदींच्या निवडणूक काळातील मांडणीची उडवली खिल्ली
लखनौ -मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात केलेल्या मांडणीची खिल्ली बसपच्या प्रमुख मायावती यांनी उडवली आहे. जनतेच्या कल्याणासाठी मजबूर सरकारच चांगले, असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधकांची महाआघाडी सत्तेत आल्यास ते सरकार मजबूर ठरेल. त्याउलट, बहुमतातील सरकार मजबूत असेल, अशी भूमिका मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मांडली. त्याचा संदर्भ मायावती यांनी बसप नेत्यांच्या बैठकीत बोलताना दिला. केंद्रात आणि उत्तरप्रदेशात पूर्ण बहुमताची सरकारे आहेत. तसे असूनही उत्तरप्रदेशात आवश्यक ती सुधारणा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी मजबूत सरकारऐवजी मजबूर सरकार असलेलेच बरे. मजबूूर सरकार भीतीमुळे जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहील. ते सरकार एकतंत्री कारभार करणार नाही. त्या सरकारमधील नेते कायदा हाती घेणार नाहीत. तसेच, भ्रष्टाचार आणि अनागोंदीही करणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.
उत्तरप्रदेशच्या पूर्वांचल विभागातील स्थिती अतिशय बिकट आहे. अपरिहार्यतेपोटी लोक त्या विभागातून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. तेथील जनतेला प्रगती आणि चांगली कायदा-सुव्यवस्था स्थिती हवी आहे, असा सूर बसपच्या बैठकीत उमटला.