कारणे काय? ः समपुदेशन कक्ष स्थापन करा; महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संस्थांना आदेश
पुणे – राज्यातील गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत दहावीनंतरच्या तंत्रनिकेतनामध्ये (पॉलिटेक्निक) प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तंत्रनिकेतनामध्ये विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन कक्ष स्थापन करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने तंत्रनिकेतन संस्थांना दिले आहेत.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी तंत्रनिकेतनामध्ये अधिकाधिक प्रवेश होण्यासाठी मंडळमार्फत प्रत्येक जिल्ह्यात मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येते, तरीही विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
त्यानुसार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व तंत्रनिकेतांना त्यांच्या परिसरात एक समुपदेशन स्थापन करावा. त्याद्वारे पदविका अभ्यासक्रम व प्रवेशप्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांना योग्य माहिती देऊन मार्गदर्शन करण्याबाबतचे आवाहन मंडळाने संस्थांना केले आहे. समपुदेशन कक्ष मुख्यत:संस्थेच्याप्रवेशद्वाराजवळ असावा.
अभ्यासक्रमाची योग्य माहिती करून देण्यासाठी दोन अधिव्याख्यांताची नियुक्ती समुपदेशन कक्षासाठी करावी. या कक्षात विविध पदविका अभ्यासक्रम, भविष्याती संधी, माजी विद्यार्थी यशोगाथा, नोकरभरतीच्या संधी, शिष्यवृत्ती इत्यादीचे पोस्टर प्रदर्शित करावे तसेच त्याबाबतचे सादरीकरण करावे. प्रवेश अथवा करिअरसंबंधी शंकाचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.